महाराष्ट्रातील कृषी निर्यातीला नवे बळ बापगाव व काळडोंगरी येथे 240 कोटींचे अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प-जयकुमार रावल पणन मंत्री

मुंबई – महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला निर्यातीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बळ देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे एकूण 240 कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठीचा प्राथमिक अहवाल तयार झाला असून, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली.
बापगाव प्रकल्पासाठी 157 कोटी रुपये, तर काळडोंगरी प्रकल्पासाठी 81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या बैठकीस आमदार चरणसिंग ठाकूर, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक संजय कदम, तसेच मझार्स ॲडव्हायजरी एलएलपी या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, “महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे निर्यात राज्य असून, या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारून निर्यातीला गती दिली जाणार आहे. पूर्वीच्या प्रकल्पांचा अभ्यास करून कार्यक्षम आणि कायमस्वरूपी सुविधा निर्माण करणे हेच उद्दिष्ट आहे.”
बापगाव प्रकल्पात असणार:
• व्हेपर हिट ट्रिटमेंट प्लँट, विकिरण प्रक्रिया सुविधा
• पॅक हाऊस, शितगृह, आयात हब
• साठवण व व्यावसायिक कॉम्प्लेक्स
• सार्वजनिक-खाजगी भागीदारीत सुविधा
काळडोंगरी प्रकल्पात असणार:
• संत्रा व मिरचीसाठी पॅकहाऊस, प्रिकुलिंग, ग्रेडींग लाईन
• कोल्ड स्टोअरेज, ग्रेन शेड, सोलर टनेल डायर
• स्टेम कटिंग व व्हॅक्युम पॅकींग मशीन
• गोदाम व व्यावसायिक कॉम्प्लेक्स
हे प्रकल्प सुरु झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारात प्रवेशाची संधी मिळेल आणि निर्यातक्षम उत्पादनांना व्यावसायिक व आधुनिक प्रक्रिया सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.