राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर 15 दिवसांत तोडगा आकाश फुंडकर कामगार मंत्र्यांचा आदेश

मुंबई :राज्यातील विविध माथाडी मंडळांमधील नोंदणीकृत कामगारांच्या दैनंदिन तसेच धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांची पंधरा दिवसांच्या आत सोडवणूक करण्याचे आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. यासोबतच कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्या माध्यमातून प्रत्येक मुद्द्यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मंत्रालयात युनियन प्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले होते.
बैठकीस युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णत पाटील तसेच कामगार सचिव डॉ. कुंदन मॅडम, उप सचिव स्वप्निल कापडनीस, सह आयुक्त शिरीन लोखंडे आणि विविध माथाडी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुढील प्रमुख प्रलंबित विषयांवर चर्चा झाली:
• पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळातील टाटा मोटर्स, टाटाटोयो (हिंजवडी), युनिसोर्स पेपर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपन्यांतील कामगारांचे प्रश्न
• कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे यार्ड व बाजार समिती परिसरातील माथाडी कामगारांचे प्रश्न
• मुंबई भाजीपाला व ग्रोसरी मार्केट तसेच रेल्वे लेबर बोर्डातील मजुरी व लेव्ही वसुलीबाबत कलम १३ नुसार कारवाई
• सातारा, लातूर व नाशिक जिल्ह्यातील कामगारांचे कलम ३२ अन्वये मजुरी दर निश्चिती
• चेअरमन, सेक्रेटरी आणि मुकादमांची जबाबदारी ठरवून ती काटेकोरपणे राबवण्याचा निर्णय
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, राज्यातील माथाडी कामगारांना दिलासा देणारे हे पाऊल ठरणार आहे.